रमजान महिन्यात वारंवार वीजखंडित; विद्युत अभियंत्यांना दिले निवेदन
काँग्रेस नगरसेवक भाईजान यांचा महावितरणला इशारा

चिखली : पवित्र रमजान महिन्यात शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक उबेद अली खान शब्बीर अली खान उर्फ भाईजान यांनी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी महावितरणच्या विद्युत अभियंत्यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करून उपवास करीत आहेत. अशा परिस्थितीत विशेषतः शुक्रवार तसेच इतर दिवशीही वारंवार लाईन जात असल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. उपवासाच्या काळात वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असताना होणारा खंडित प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रमजान महिन्यात लहान मुले व महिलाही उपवास करीत असल्याने उकाड्यात वीज नसल्यामुळे त्यांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन वारंवार होणारा वीजपुरवठा बंद पडण्याचा प्रकार थांबवून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
समस्येचे तात्काळ निराकरण न झाल्यास कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



